सातारा – करोनाच्या वेदनादायी स्मृती आणि महागाईचा चटका या सर्व गोष्टी मागे ठेवत सर्वसामान्य सातारकर सोमवारपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवासाठी सज्ज झाला आहे .सोमवारी पहिल्या अभ्यंगस्नानाच्या आणि लक्ष्मीपूजनाचा पारंपरिक जल्लोष आणि उत्साह साताऱ्यात सर्वत्र दिसून येत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण सातारा शहर खरेदीच्या मस्त मूडमध्ये दिसून आले. राजपथावरच्या गर्दीने रात्री आठ वाजता उच्चांक गाठला होता.
सातारा शहरातील वेगवेगळ्या सामाजिक मंडळांनी सामाजिक जाणीवांचे भान ठेवत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून दिवाळी साजरा करायचे धोरण ठेवले आहे .सातारा आगारामध्ये लांब पल्ल्यांच्या एसटी वाहनांवरील चालक वाहकांसाठी अभ्यंगस्नानाची सोय करण्यात आली आहे. “सवयभान’ सामाजिक संस्थेच्यावतीने साताऱ्यात गरजू मुलांसाठी तसेच राजपथावरील काही व्यापारी पेठेतील मंडळींनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी मिष्टान्न फराळ सेवेचे नियोजन केले आहे. सातारा शहरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ग्रामदैवत ढोल्या गणपतीचे दर्शन त्याचबरोबर कुरणेश्वराच्या दर्शनाने सुरमयी संगीत कार्यक्रमाने सातारकरांच्या दिवसाची सुरुवात होणार आहे.
नरक चतुर्दशीला नरकासुराच्या वधाची आख्यायिका सांगितली जाते आणि सायंकाळी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व असते. लक्ष्मी ही केवळ पैसा धनप्राप्ती किंवा श्रीमंती असा अर्थ अपेक्षित नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे. धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, आरोग्य, समृद्धी, प्रतिष्ठा, सन्मान हा या मागचा व्यापक अर्थ आहे. या लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी खरेदीसाठी सातारकरांनी गोल बागेजवळ गर्दी केली होती. तसेच व्यापारी पेठांमध्ये वही पूजनासाठीसुद्धा आकर्षक लाल रंगाच्या हिशोबाच्या खतावणी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी व दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने दोनच दिवस खरे जल्लोषाचे आहेत.
मंगळवारचा दिवस हा भाकड दिवस असून त्यदिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आणि दिवाळी पाडवा साजरा होणार आहे. त्यामुळे साताऱ्यात खरा जल्लोष सोमवारीच पाहयला मिळणार आहे. वाहतूक पोलिसांनी सुद्धा शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून जय्यत बंदोबस्त तैनात केला आहे. सेवा रस्त्याने बहुतांश वाहतूक वळवण्याचे नियोजन आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेप्रमाणे सातारा शहरातील एन्ट्री पॉईंटवर बंदोबस्त वाढवण्यात आला असून फार गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
व्यापाऱ्यांमध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ, सराफ कट्टा आणि वाहन विश्वामध्ये यंदाची दिवाळी खरोखर शुभ संदेश घेऊन आली आहे. एका प्राप्त माहितीनुसार यंदाच्या दिवाळीत काही वाहनांच्या आकर्षक रेंज उपलब्ध झाल्याने वाहन खरेदीमध्ये 20 टक्के तर सोने खरेदीमध्ये सुद्धा 20 टक्के वाढ झाल्याने व्यापारी वर्ग प्रचंड खुशीमध्ये आहे. साताऱ्यात काही महिला मंडळ ग्रुपच्या वतीने आकर्षक रांगोळीची आरास केली जाणार आहे. शहरात सायंकाळी खरेदीचा उत्साही माहोल होता. फराळ बाजारामध्ये सुद्धा मोठी उलाढाल होती. मिठाई व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार जवळपास 50 टन मिठाई यापूर्वीच परदेशामध्ये रवाना झाली आहे.