जळोची – बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही. बारामतीत आल्यानंतर वेगळं बोलायचं. मराठवाड्यात गेल्यानंतर बारामतीवर बोलायचं, हा प्रकार योग्य नाही, असा टोला माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
देवेंद्र फडणवीस हे धाराशिव येथे पांगदरवाडी येथील प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. त्याठिकाणी यंत्र पूजा करताना त्यांनी बारामतीने मराठवाड्याचे पाणी अडवले होते, असा आरोप केला होता. तो आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फेटाळला. परंतु रविवार (दि.18) माजी मंत्री शिंदे हे पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
शिंदे म्हणाले की, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा एकट्या आमदार, खासदारांना नसतो. तो संपूर्ण राज्याला असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. कोणतीही गोष्ट ठरताना ती फक्त एका एका आमदार खासदारापुरते ठरत नाही तर ती संपूर्ण राज्य आणि केंद्र किंवा देशासमोर ठेवून तो निर्णय घेतलेला असतो. अशावेळी कोणावर ही वैयक्तिक टीका करणे हे बरोबर नाही.
कुठेही, कुणाचेही पाणी अडवले नाही
शिंदे म्हणाले की, बारामतीचे नाव घेतले की, प्रसिद्धी मिळते म्हणून बारामतीने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले, असा अपप्रचार विरोधक करतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. वास्तविक आम्ही मंत्रिमंडळात असताना मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कुठेही पाणी कुणाचेही अडवलेले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.