नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने विविध राज्यांचा दौरा करत असून त्या अंतर्गत ते आज तमिळनाडूच्या तिरूनेलवेली येथे दाखल झाले. यावेळी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या राज्यातील सत्तारूढ द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की जेंव्हा भारत अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या तयारीत गुंतला होता त्याच्या काही दिवस अगोदर संसदेत एक प्रस्ताव मांडण्यात आला होता.
त्यावेळी द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला होता. तुमची श्रध्दा आणि तुमच्या भावनांचा हे लोक किती तिरस्कार करतात हे दर्शवणारीच त्यांची वर्तणूक होती. द्रमुकसोबतच त्यांनी कॉंग्रेसलाही लक्ष्य केले. भारतीय जनता पार्टी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्य मानते. मात्र कॉंग्रेस आणि द्रमुक हे पक्ष देशाची विभागणी करण्याचे काम करत आहेत.
एकीकडे तुमच्याकडे विकासावर लक्ष केंद्रीत करणारे भाजपचे सरकार आहे तर दुसरीकडे तुमच्याकडे कॉंग्रेस आणि द्रमुक हे असे दोन पक्ष आहेत की ज्यांचे प्राधान्य त्यांच्या कुटुंबालाच आहे. या घराणेकेंद्रीत राजकीय पक्षांना जर तुम्ही तमिळनाडूच्या विकासाच्या संदर्भात तुमच्याकडे कोणत्या योजना आहेत असे विचारले तर ते त्याचे उत्तर देऊ शकणार नाहीत.
पंतप्रधान पुढे म्हणाले की दक्षिणी तमिळनाडूच्या मुद्द्यांच्या प्रती भाजप संवेदनशील आहे. त्यावर आम्ही काम करू आणि या भागाच्या विकासाला गती देऊ. लोकांनी रोजगारासाठी दूर जावे लागणार नाही आणि ही मोदींची गॅरंटी आहे.
माझ्याकडे गेल्या दहा वर्षांत केलेली कामगिरी आणि पुढच्या पाच वर्षांत काय करायचे याचा रोडमॅप आहे. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही आपल्या उद्योग जगताचा विस्तार करत आहोत. सरकारी परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. एआय आणि इतर नवे तंत्रज्ञान आपल्या देशाला अधिक शक्तीशाली करेल. युवकांसाठी नवीन संधी निर्माण केल्या जातील. पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असेल.
ते पुढे म्हणाले की द्रमुक हा पक्ष काम करत नाही, मात्र श्रेय घेण्यासाठी सगळ्यांत पुढे असतो. आम्ही घेतलेल्या पुढाकाराला ते नवीन नाव देतात आणि त्यांनीच सुरू केले असल्याचे भासवतात. त्यांना भारताची प्रगती नको आहे. आपले शास्त्रज्ञ, अंतरिक्ष क्षेत्र आणि तुमच्या कराच्या पैशाचा त्यांनी अपमान केला आहे.
जर देश शंभर पाऊले पुढे जाणार असेल तर तमिळनाडूही त्याच वेगाने पुढे गेला पाहिजे हा माझा संकल्प असल्याचे सांगत त्यांनी तमिळनाडूत सुरू करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.