अकोले -निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने कळस बु. येथील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पाहणी केली. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे तातडीने करावेत, अशा मागणी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.
त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलास वाकचौरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, शंभू नेहे, राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, ऊस, मका, उन्हाळी बाजरी, टोमॅटो, चवळी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवीण वाकचौरे व पांडुरंग वाकचौरे यांच्या पॉलिहाऊस व शेडनेट, शांताराम वाकचौरे, बाळासाहेब बिबवे, संजय ढगे, गंगाधर वाकचौरे यांच्या डाळींब बागा, मच्छिंद्र भोर यांचा ऊस, तर पोपट वाकचौरे यांच्या घराच्या नुकसानीची पाहणी केली.
त्यानंतर तहसीलदार मुकेश कांबळे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कामगार तलाठी रोशन गायकवाड, कृषी सहायक अमृता गोंदके आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी संगमनेर कारखान्याचे माजी संचालक सीताराम वाकचौरे, कळस सोसायटी अध्यक्ष विनय वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, डी. टी. वाकचौरे, विजय वाकचौरे, भाजप युवा मोर्चाचे नामदेव निसाळ यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.पिचड यांच्यासमोर या शेतकऱ्यांनी पंचनामे झालेले नाहीत, मागील अनुदान प्राप्तीमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले, तलाठी वेळेवर येत नाहीत असे सांगितले. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी पिचड यांनी केली.