राष्ट्रवादीकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक
पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि देशाची अस्मिता आहेत. बंगळुरू येथे झालेली त्यांच्या पुतळ्याची विटंबना आणि अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. निवडणुकांमध्ये मते मिळविण्यासाठी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. त्यांचा अवमान होण्यासाठी जबाबदार असलेले कर्नाटकचे भाजप सरकार केंद्र सरकारने तात्काळ बरखास्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.
कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 19) पिंपरीतील एचए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच पुतळा विटंबना घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, माजी नगरसेवका अमिना पानसरे, शाम जगताप, विजय लोखंडे, विशाल काळभोर, प्रसाद कोलते, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
संजोग वाघेरे म्हणाले, केंद्र सरकारने शिवप्रेमींच्या भावना आणि राष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी तात्काळ या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. या घटनेला जबाबदार धरून कर्नाटकातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच, सरकार बरखास्त करावे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची खबरदारी घ्यावी.