पिंपरी – गेले दोन वर्ष सारे जग करोनासारख्या महामारीने त्रस्त झाले आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. काही जणांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. या साऱ्या गोष्टींचा खूप खोलवर परिणाम मानवी मनावर होत आहे. हाच परिणाम म्हणून पिंपरी चिंचवड शहरात दररोज दोन ते तीन आत्महत्येच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेचे कारण ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर आता पोलीस अधिकारी देखील वाढत्या आत्महत्यांबद्दल चिंता व्यक्त करु लागले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरी आणि कामगारनगरी म्हणून ओळखली जाते. करोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. डोक्यावर वाढते कर्ज, संपुष्टात आलेले उत्पन्नाचे स्त्रोत यामुळे जीवन संपवून या त्रासातून मुक्त होणे हाच पर्याय अनेकजण निवडत असल्याचे दिसून येत आहे. यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. उच्च शिक्षण आणि भरघोस पगार यामुळे तरुणाई मोठ्या शहरात स्थलांतरित झाली होती. मात्र करोना महामारीने अनेकांचे हे स्वप्न हिरावून घेतले.
सरकारने सहा महिने हप्ता न भरण्याची मुभा दिली. पण त्याच्या अतिरिक्त व्याजामुळे रक्कमेत वाढ होत गेली. परिणामी घरांचे, गाडीचे हप्ते भरणार कसे? असा विचार लॉक डाऊननंतर मेटाकुटीला आलेला प्रत्यक नागरिक करीत आहे. त्यात फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाची वसुली करणाऱ्यांनी गुंडशाही अवलंबून कर्ज वसूल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे होणारा अपमान टाळण्यासाठी अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. अनेक जण आपल्या गावी परतून मिळेल ते छोटे मोठे काम करीत आहेत. मात्र काहींना त्यातही यश मिळाले नसल्याने आत्महत्या अखेरचा मार्ग स्वीकारला.
नैराश्यावर मात करणे गरजेचे
दररोज होणाऱ्या दोन ते तीन आत्महत्येचे मुख्य कारण हे ‘नैराश्य’ असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तरुणांचे मनोबल खचू नये यासाठी, शासनातर्फे विविध उपाययोजना करोना काळापासून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या उपाययोजनांसोबतच आपल्या जवळच्या माणसांनीदेखील नैराश्याच्या लक्षणांची योग्य दखल घेणेही गरजेचे आहे. तरुणांसोबतच, आत्महत्येचे प्रमाणही करोना काळात वाढीस लागले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे आई वडीलदेखील कुटुंब जगविण्याच्या धडपडीत इतके अडकले आहेत की, आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत झालेल्या नाही. पालकांनी आपल्या मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे ओळखून त्यांना त्वरीत वैद्यकीय उपचारांसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अनेक सामाजिक नैराश्यग्रस्त संस्थांनीदेखील नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
निश्चित आकडा सांगणे अवघड
शहरात रोज आत्महत्येच्या घटना घडत आहेत. परंतु सुसाइड नोट मिळाल्यास किंवा कुटुंबीयांनी एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दिल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होतो. परंतु आर्थिक विंवचेतून झालेल्या आत्महत्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद होते. यामुळे आत्महत्येचा निश्चित आकडा सांगणे अवघड आहे.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीव देऊ नका
फायनान्स कंपन्यांसोबत शहरात खासगी सावकारांचा व्यापही वाढला आहे. या सावकारांची वसुली कोणत्याही व्यक्तीला आर्थिक रुपाने रसातळाला तर नेतेच परंतु सोबतच सामाजिक प्रतिष्ठाही संपवून टाकते. अशा सावकारांच्या त्रासाला कंटाळून जीव देऊ नका, अवास्तव व्याज घेणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या सावकराची थेट तक्रार करा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच केले आहे.