पिंपरी – कोणतीही खरेदी करण्याची म्हटले की, क्षणात मोबाइलवरून डिजिटल पेमेंट केले जाते. पाकिटात पैसेच ठेवले जात नसल्याने पाकिटमारी बंद झाली आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा मोबाइल व दागिन्यांच्या चोरीकडे वळविला आहे. तर दुसरीकडे चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही असूनही लुटमारीचे प्रकार सुरूच आहेत. पाकिटमारी पोलिसांमुळे नव्हे तर टेक्नोलॉजीमुळे बंद झाली आहे. मात्र लुटमारीला आळा घालण्यातही पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत.
खिशातील पैसे सुरक्षित राहण्यासाठी पाकीट वापरले जायचे. मात्र, चोरटे याच पाकिटावर नेम धरून गर्दीचा फायदा घेत चोरी करायचे. पाकीटामध्ये असलेल्या पैशांसह रेल्वे पास, बस पास, वाहन चालक परवाना, ओळखपत्र किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला जायची. रेल्वेत, बसमध्ये चढताना, यात्रेत तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी पाकिटमारीच्या अनेक घटना घडल्या. मात्र, डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकजण या सेवेचाच वापर करतात.
मोबाइलमध्ये अप डाऊनलोड केल्यानंतर सहजरित्या डिजिटल पेमेंट करणे शक्य होते. तसेच महत्त्वाची कागदपत्रेही मोबाइलमध्ये जतन करता येतात. दरम्यान, चोरट्यांनी आता पाकीटमारी ऐवजी मोबाइल व नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या गळ्यातील दागिन्यांना लक्ष्य केले आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणीही सहजरित्या चोरटे डल्ला मारत आहेत. दागिने खेचून नेताना काहींच्या तर जिवालाही धोका पोहोचत आहे. दररोज दाखल होणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोबाइल चोरी व सोनसाखळी चोरीच्या बहुतांश गुन्ह्यांचा समावेश असल्याचे दिसून येते.
निगडी, भोसरी याठिकाणी बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या महिलांनी दागिने चोरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पहाटे किंवा रात्रीच्यावेळी एकट्या नागरिकाला गाठून त्यास मारहाण करून लुटमार केल्याच्या घटनाही घडत आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी सुरक्षा रक्षक असलेल्या सोसायटीमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरटे घुसले व महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. तसेच गुन्हे उघडकीस येण्यएाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शहरात चोरटे मस्त अन् पोलीस सुस्त असे चित्र पाहायला मिळत आहे.
साडेपाच वर्षांत चारच घटना
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात मागील चार वर्षांत पाकीटमारीच्या केवळ चारच घटनांची नोंद झाली. तर 2022 मध्ये आणि 2023 मधील मे महिन्याच्या अखेरपर्यंत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. ही दिलासादायक बाब आहे.