पिंपरी, दि. 9 (अमोल शित्रे) – शहराची वाढती लोकसंख्या पाहता भविष्याचा वेध घेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी 24 तास शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजना राबवली. या योजने अंतर्गत शहराच्या उपनगरांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले. त्याचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले तरी पाणी पुरवठा यंत्रणेला मात्र अपयश आले आहे. 24 तास पाणी पुरवठा तर दूरच पण रोज नियमित पुरेसा पाणी पुरवठा करण्यात देखील ही यंत्रणा यशस्वी होऊ शकली नाही. पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही अपुरा, अशुध्द व कमी दाबाने सोडण्यात येणा-या पाणी पुरवठ्याचा जाच सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड हे नोकरी, व्यवसाय आणि राहण्यायोग्य शहर असल्याने देशाच्या कानाकोप-यातून नागरिक येऊन शहरात स्थायिक झाले. महापालिका त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल करते परंतु पुरेशा प्रमाणात पाणी देखील पुरेशा पुरवित नाही. शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणातील मंजूर पाणी कोटा मर्यादित असल्याचे कारण सांगून पालिकेने 2019 मध्ये नागरिकांच्या माथ्यावर दिवसाआड पाणी टंचाई लादली. तत्पूर्वी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यातच दिवसाआड किंवा एकवेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला जायचा. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून वर्षाचे बाराही महिने सलग नागरिकांना दिवसाआड पाणी दिले जाते. त्यातही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे गृहिणींची परवड होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर, सेक्टर 22, त्रिवेणीनगर, चिंचवड, पवनानगर, उद्यमनगर, पिंपरीतील भाटनगर, पिंपरी गावठाण, काळेवाडी गावठाण, संपूर्ण थेरगाव, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, दापोडी, चिखली, मोशी, जाधववाडी, च-होली, डुडुळगाव, चोविसावाडी आणि दिघी या परिसरात राहणा-या नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या भागातील नारिकांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. त्यातही अशुध्द आणि दिवसाआड पाणी सोडले जात असल्यामुळे नोकरीसाठी घराबाहेर पडणा-या व व्यवसायासाठी वेळेची मर्यादा पाळणा-या महिलांची तारांबळ होत आहे. त्यातच शहरातील बड्या गृह प्रकल्पात चौथ्या, पाचव्या आणि तेथून वरील मजल्यावरील सदनिकेत राहणा-या नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.
कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे चौथ्या मजल्यावर पाणी चढत नसल्याच्या तक्रारी आहेत. बैठ्या घरांना अशुध्द पाणी पुरवठा केला जातो. दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याच्या अनेक तक्रारी दापोडी, कासारवाडी भागातून प्राप्त झाल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास शहराला मोठ्या संकटातून वाटचाल करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
ऐन दिवाळीत भावाला अंघोळ घालण्यासाठी घरात पुरेसे पाणी नव्हते. आधी चार तास पाणी येत होते. त्यामुळे मुबलक पाणी मिळायचे. सध्या वेळीअवेळी पाणी येते. त्यातही पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, घरातील कामे उरकत नाहीत. लहान मुलांना सकाळी लवकर शाळेत सोडणे शक्य होत नाही. त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर याचा परिणाम पडतो.
सृष्टी तापकीर, गृहिणी, वडमुखवाडी, चऱ्होली
शेती असल्यामुळे घरातील सदस्यांना शेतात काम करण्यासाठी जावे लागते. सर्वजण शेतात गेल्यानंतर नळाला पाणी येते. त्यातही विद्युत पुरवठ्याअभावी वेळी अवेळी पाणी येते. कधी दुपारी तर कधी पहाटे पाणी येते. दिवसभर काम करून थकलेल्या नागरिकांनी पहाटे पाणी भरायचे का? त्यातही अशुध्द पाणी आल्यास विकत पाणी घ्यावे लागते.
-प्रणिता पठारे, गृहिणी, पठारे मळा
24 बाय 7 पाणी पुरवठा करण्याचा गाजावाजा केला. या योजनेसाठी ज्या भागात पाइपलाइन केली. त्या भागात तरी पूर्णवेळ पाणी पुरवठा केला पाहिजे. आज दिवसाआड पाणी येते. ते देखील पुरेसे येत नसल्यामुळे आमची गेरसोय होत आहे. करोडो रुपये खर्चून दुरुस्तीची कामे काढली जातात. त्यामुळे गढूळ पाणी भरावे लागते. दूषित पाण्यामुळे आम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वैशाली मराठे, रस्टन कॉलनी, चिंचवड
सध्या दिवसाआड पाणी येते. पण, कधीकधी सलग तीन ते चार दिवस पाणी येत नाही. त्यातही गडूळ पाणी मिळत असल्यामुळे थोड्या वेळाने शुध्द पाणी येण्याची वाट पाहत बसावे लागते. जर पाणी गेले तर पुरेसे पाणी मिळत नाही. भरलेले पाणी दोन दिवस जपून वापरावे लागते. सध्या घरातून काम (वर्क फ्रॉम होम) असल्यामुळे जास्त पाणी लागते. पुरेसे पाणी मिळाले नाही, तर पाण्याचे जार विकत घ्यावे लागतात.
– प्रियंका दुबे, सॉफ्टवेअर इंजिनिअर, थेरगाव
निगडी सेक्टर 22 मध्ये पाण्याची नेहमीचीच समस्या आहे. कमी दाबाने पाणी सोडल्यामुळे चौथ्या मजल्यावर पाणी येत नाही. गेली आठ ते दहा दिवस प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. आजही पहाटे तीन वाजता पाणी सोडले जाते. चौथ्या माळ्यावर पाणी येत नसल्यामुळे तळमजल्यावर जाऊन पाणी भरावे लागते. गरोदर महिलांनी पाण्याचे हांडे घेऊन चार मजले कसे चढायचे?.
– पिंकी चौधरी, गृहिणी, सेक्टर 22
नेलगे पगारिया प्लाझा, विपुलानंद सोसायटीमध्ये दर तीन दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यातही गढूळ व दूषित पाणी येत असल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. घरातील लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका वेळेवर टॅक्स वसूल करते मग आम्हाला पुरेसे पाणी का देत नाहीत?.
रेश्मा चौधरी, गृहिणी, भोसरी
अमृत योजना अपयशी
24 बाय 7 पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ठ
2011 मध्ये अमृतच्या कामाचा शुभारंभ
निगडी प्राधिकरण, आकुर्डी, संभाजीनगर, शाहूनगर, दिघी आदी भागात
80 टक्केच काम पूर्ण
दहा वर्षात 274 कोटी 72 लाख
82 हजार 762 रूपये खर्च पाण्यात
2022 मध्येही काम अपूर्ण
चौथ्या माळ्यावर पाणीच येत नाही
निगडीतील यमुनानगरमध्ये पाच मजल्याहून अधिक उंचीच्या गृह निर्माण संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. उंचीवरील सदनिकांमध्ये राहणा-या नागरिकांना पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे तिस-या मजल्यावर पाणी चढत नाही. तसेच, सेक्टर 22 येथील जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निमाण योजनेंतर्गत महापालिकेने सात ते आठ मजली इमारती बांधल्या आहेत. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पहाटे 3 वाजता पाणी सोडले जाते. उंचीवरील सदनिकांमध्ये राहणा-या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना तळमजल्यावर येऊन पाणी भरावे लागते. उच्च दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात
रावेत, वाल्हेकरवाडी आणि चिंचवडच्या काही भागात छोट्या अपार्टमेंटमध्ये राहणा-या नागरिकांना रात्री उशीरा येणा-या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी दुपारी व काही ठिकाणी सायंकाळी पाणी येते. मात्र, अपार्टमेंटमधील उंचीवरच्या सदनिकांमध्ये राहणा-या ज्येष्ठ नागरिकांना पुरेसे पाणी न मिळाल्यास तळमजल्यावर येऊन पाणी भरावे लागते. पाण्याचे हंडे घेऊन त्यांना इमारतीचे मजले चढणे शक्य होत नाही. चिंचवडच्या काही भागात, रावेत आणि वाल्हेकरवाडीत पहाटे 5 ते सकाळी 8.30 दरम्यान दिवसाआड पाणी सोडले जाते. पाणी भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
टॅंकर लॉबीचा धंदा जोरात
मोशी, च-होली, वाकड आणि पुनावळे भागातील उच्चभ्रू वसाहतीत राहणा-या नागरिकांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या भागात टोलेजंग इमारती असल्यामुळे पाण्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे त्यांना वापरायचे पाणी पुरेसे मिळत नाही. नागरिकांच्या वापरायच्या पाण्याची सोय करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी टॅंकर लॉबीला हाताशी धरून पाणी पुरवठ्याची मागणी केली जाते. त्यापोटी सोसायटीमधील नागरिकांकडून मेन्टेनन्स चार्ज म्हणून संकलित केलेल्या पैशातून हा खर्च भागवावा लागतो. टॅंकरमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांच्या युतीचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.
पवना धरण पाणी योजना अपूर्ण
मंजूर पाणी कोटा 500 दशलक्ष लिटर
पाणी गळती सुमारे 35 टक्के
पाणी पुरवठा 65 टक्के
125 कोटींचे नुकसान
दिवसाआड पाणी पुरवठा
बंदिस्त जलवाहिनीचे काम ठप्प