पिंपळे निलख (संदीप सोनार) – जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व डॉक्टरांच्या राहण्यासाठी असलेले शासकीय निवासस्थान आता शेवटची घटका मोजत आहे. जिल्हा रुग्णालय औंध, सांगवी येथील रुग्णालयाच्या मागील बाजूस तसेच इतर भागांत असलेले तीन मजली तसेच दुमजली इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे निवासस्थानाबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसराची साफसफाई करून इमारत नव्याने उभारावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या व आरोग्य सेवा देणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच रुग्णालयातील इतर आरोग्य सेवक व निवासी डॉक्टर यांच्यासाठी शासनाने जवळपास 30 ते 35 वर्षांपूर्वी निवासस्थान उभारले आहे. जुन्या व कालबाह्य बांधकाम झालेली ही शासकीय निवासस्थाने व इमारती आता मोडकळीस येऊन शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या इमारती कधीही कोसळून तसेच जुन्या इमारतीत इतर अपघात होऊन किंवा सर्पदंश व आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या या ठिकाणी रुग्णालय प्रशासन ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची तसेच महाराष्ट्र राज्य सरकार व इतर विभागाचे असल्याचे सांगून याकडे दुर्लक्ष करत आहे. असे असूनही या शासकीय निवासस्थानांमध्ये कायदेशीर व अधिक संख्येने बेकायदेशीर पद्धतीने इतर लोक राहत असल्याने एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे रुग्णालय प्रशासन तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग तसेच स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे अतिशय धोकादायक चित्र आहे. या ठिकाणी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक फक्त शासकीय व इतर क्षेत्रातील बिले व इतर योजना मंजूर करण्यासाठी खुर्चीवर बसवण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण आजपर्यंत या अगोदर असणाऱ्या कोणत्याही जिल्हा शल्य चिकित्सक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे येथील रहिवासी व त्यांच्या घरातील सभासदांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी असलेल्या निवासस्थानाची देखरेख व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात काम करणारे कर्मचारी व निवासी डॉक्टर राहतात. सदर निवासस्थान भाडे हे त्या कर्मचारी वेतनातून कट होते. याठिकाणी असलेल्या अनधिकृतरित्या राहत असलेल्या लोकांना नोटीस देण्यात आली आहे.
– डॉ. नागनाथ एमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध रुग्णालय.
समस्यांचे आगार
जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस तसेच दोन्ही बाजूला असणाऱ्या शासकीय कर्मचारी निवासस्थाने कालबाह्य व मोडकळीस आली आहेत. इमारतींवर मोठ्या प्रमाणावर गवत व शेवाळ साचले आहे. ड्रेनेजलाइन फुटल्याने दूषित पाणी वाहत आहे. बहुतांशी गटारी उघड्या आहेत. डुकरांचा वावर, काटेरी झाडेझुडपे तसेच कचऱ्याचे साम्राज्य हे सामान्य चित्र व नेहमीचे असल्याचे दिसून येत आहे. या धोकादायक इमारतीत मात्र राहण्यासाठी मंजुरी कशी देण्यात आली व याची ना हरकत प्रमाणपत्र कोणी दिले याचा विचार होणे हे यानिमित्ताने बघणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांकडून भाडेवसुली
चतुर्थश्रेणी कर्मचारी रुग्णालयातच काम करत असून आपण या ठिकाणी अधिकारी असल्याचे नागरिकांना भासवत आहेत. तसेच त्याच्या राहणीमान व कपडे यावरून त्याला नागरिक बळी पडत असल्याची माहिती येथील राहिवाशांकडून सदर व्यक्ती भाडे गोळा करत असल्याचे नाव न सांगण्याचा अटीवर रहिवाशांनी सांगितले. याठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने वराह पालन केले जात आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. रुग्णालयाच्या काही मीटर अंतरावर असणारे हे चित्र जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशासनास का दिसत नाही हे या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट आहे.
पोट भाडेकरूंची गर्दी
या ठिकाणी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी सोडून इतर अनेक खासगी भाडेकरू, पोट भाडेकरू या ठिकाणी सर्रास रहिवास करत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नोंद घेण्यासाठी स्थानिक उपशल्यचिकित्सक व प्रशासनास वेळ नसल्याचे ही बाब गंभीर आहे. रुग्णालयास लागूनच भारतीय सैन्यभूमी असून याठिकाणी औंध मिलीटरी स्टेशन असून अतिशय संवेदनशील भाग आहे. यामुळे अपरिचित व इतर लोक राहत असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
या संदर्भात रुग्णालयाचे अधिकारी यांना विचारले असता सदर इमारती बांधण्याची व त्यासंदर्भात जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले जाते. तर सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम महाराष्ट्र शासनाने व आरोग्य विभागाकडे येत असल्याचे सांगत आहे. यामुळे जबाबदारी ढकलण्याचे काम केले जात असून, जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.