मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि ‘शिवसेना’ हे नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने दिलेला हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयावर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शरद पवार यांनी,“निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी हा वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला, लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
तर उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे. “निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आता सरकारची दादागिरी सुरु आहे. पंतप्रधानांनी आता जाहीर करावे लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे. न्याययंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असून, आजचा निकाल अत्यंत अनपेक्षित आहे.”
“सहा महिने न्यायालयात लढाई सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असे बोललो होतो. पण, जगातल्या मोठ्या पक्षाची स्वतः हून लढण्याची हिंमत नाही. आता चिन्ह मिंधे गटाला दिल्यावर मनपा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी ही भाजपाची रणनिती आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.