पिंपरी – भामा आसखेड धरणातील पाणी आणण्यासाठी जलवाहिनीच्या कामाला गती देण्यात आली आहे. कॉपर डॅमचे काम अंतिम टप्प्यात असून जलवाहिनी, अशुद्ध उपसा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम एकाचवेळी पूर्ण करण्यावर भर आहे. 2025 पर्यंत कामे पूर्ण होतील, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे शहरवासीयांना 2025 नंतरच दररोज पाणी मिळण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या साडेतीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे.
भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), वन, जलसंपदा विभागाच्या जागेतून होत आहे. त्यामुळे जागेचे भूसंपादन करण्यास अडचणी येत आहेत. त्यातून मार्ग काढून कामाला गती दिली आहे. महापालिका हद्दीतील आठ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जात आहे. 2025 पर्यंत काम पूर्ण होईल असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
593 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा
शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून 510, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून 70 आणि औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून 13 असे 593 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही शहराच्या विविध भागातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती शासनाने उठविली आहे. जलवाहिनीसाठी नव्याने आराखडा करायचा की पूर्वीप्रमाणेच काम सुरू करायचे याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक