पिंपरी – मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चाला अखेर यश मिळाल्याचा आनंद पिंपरी-चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला. पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साखर, पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी अरुण पवार, सचिन बारणे, प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, नकुल भोईर, मारुती भापकर, माया बारणे आदीसह सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाला कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले द्यावेत ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी सरकारने शिंदे समिती नेमली होती. पण आश्वासने देऊनही प्रश्न सोडवला जात नव्हता. त्यासाठी आंदोलनाचा शेवटचा टप्पा २० जानेवारीला सुरू झाला. मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईकडे गेले.
त्यानंतर सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. ५७ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी दाखले त्वरित देण्याचे मान्य केले. सगेसोयरे यांना दाखले देण्याचे कबूल केले. सर्व मागण्या मान्य केल्याचा आनंद असल्याच्या भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.