मुंबई : राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत आणि हैदराबाद येथे तैनात आहेत. शुक्ला आणि संबंधितांवर बंडगार्डन पोलिसांनी २६ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. त्यांनीही उच्च न्यायालयात धाव घेत बंडगार्डन पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप केले आहेत. याविषयी बोलताना त्यांनी “आजही माझे फोन आताही टॅप केले जात आहेत, पण मी माझा फोन नंबर बदललेला नाही, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न हा देशभर राबवला जात “असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी गोव्यातील नेते सुधीन ढवळीकर यांचा संदर्भ दिला आहे. “ढवळीकर यांनी म्हंटलं की आमचे फोन टॅप होत आहे. मी त्यांना म्हंटले हे सगळीकडे होत आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. याचे जे प्रमुख होते ते गोव्यातही प्रमुख होते, ” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा या माध्यमातून राजकारण केलं जातं. एवढं करुनही सत्ता येत नसेल तर KGB, CIA या यंत्रणांना आणावे लागेल अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान मुंबईत अजिबात दहशतवाद नाहीये, ठाकरे सरकार आल्यापासून हे नाहीये, विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केलाय तरी ते होणार नाही. विरोधी पक्षाला ठाकरे सरकार काम करून द्यायचे नाही, ठाकरे सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत असेही राऊत म्हणाले.