मंचर – करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र खबरदारीचे उपाय केले जात आहेत. आंबेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या मंचर शहरात सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्वतः लक्ष घालून केलेल्या उपाययोजना, त्याला आलेले यश, या सरपंचांच्या कामाची दुस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन कौतूक केले. सरपंच दत्ता गांजाळे यांना रविवारी (दि. 19) दुरध्वनी करून संवाद साधला.
सरपंच दत्ता गांजाळे व मंचर ग्रामपंचायत राबवित असलेल्या करोना विषाणूच्या उपाययोजनाबाबत विविध उपक्रमांची माहिती शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याने रविवारी (दि. 19) सरपंच दत्ता गांजाळे यांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून सर्व उपक्रमांचे कौतुक करून स्वतःची व गावाची काळजी घेण्याबाबत सांगितले. साधारणपणे 50 हजार लोकसंख्येचे मंचर गाव.
दरम्यान, दि. 20 मार्च पासून मंचर शहरात बंद पाळण्यास सुरुवात केली. तसेच सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाची संपूर्ण शहरात3 वेळा फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले. तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमितपणे पुरवठा व्हावा म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा निर्णय घेतला.
गावातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताण कमी व्हावा म्हणून लॉकडाऊन काळात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येऊन गावची भैरवनाथ यात्रा रद्द केली. शहरातील गरिब व गरजू लोकांसाठी अन्नधान्याचे व किराणा मालाचे वितरण करण्यात आले.
सरपंच दत्ता गांजाळे हे सर्व उपाययोजना करण्यासाठी घरी न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच महिनाभरापासून मुक्कामी आहेत. ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मागणी केली होती . त्यानुसार त्यांनी काम देखील सुरू केले आहे.
महाराष्ट्रचे मुख्यंत्री एक छोट्या गावच्या सरपंचाची दखल घेतात यांच्यावर माझा विश्वास बसला नाही. गेली 15 वर्षे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. खरेतर 30 तीस दिवस मंचरकरांनी दिलेल्या साथीचे फळ आहे. अशीच साथ कायम राहू द्या, आपण नक्कीच करोनावर मात करू.
-दत्ता गांजाळे, सरपंच, मंचर