नगर (प्रतिनिधी) – करोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील हातावर पोट असलेले बारा बलुतेदार व अठरा आलुतेदारांचे अतोनात हाल होत आहेत. करोनाच्या विषाणूचा फैलावास मार्च महिन्यापासून प्रारंभ झाला. त्यात लॉकडाऊन घोषित झाले. या अचानक उद्भवलेल्या संकटाने या घटकावरही उपासमारीची वेळ आली आहे.
बारा बलुतेदार व आलुतेदार या घटकातील अनेकजण भूमिहीन व दररोज मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. शहरी भागात बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर जाणवत नाही. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सुतार, लोहार, कुंभार, धोबी, न्हावी, सोनार, कोळी, पखाली, ग्रामजोशी व गुरव हे बारा बलुतेदार तसेच तेली, तांबोळी, साळी, संगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवरी, भाट, ठाकर, गोसावी, वाजंत्री, घडशी, तराळ, कोरव, भोई व शिकलगार इत्यादी अठरा आलुतेदार अस्तित्वात आहेत.
मागील काही वर्षांत ग्रामीण भागातील बलुतेदारी पद्धत म्हणजेच कामाच्या मोबदल्यात धान्य घेण्याची प्रथा बंद झाली. तथापि, कामाच्या बदल्यात पैसे देण्याची प्रथा रुढ झालेली आहे. ग्रामीण भागात अजूनही सुतार, कुंभार, न्हावी, सोनार, कोळी आदी घटकांतील माणसं तीच कामे पैशांच्या मोबदल्यात करत आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे ही सर्वच कामे बंद झाल्याने त्यांच्यासमोर देखील अर्थिक संकट ओढवले आहे.
महिनाभरापासून सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हातावरच पोट असलेल्या घटकाची मोठी कुचंबणा होत आहे. सद्यस्थितीत किमान जून महिन्यापर्यंत तरी हे संकट कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या समाजांचा धीर आता सुटत चालला आहे. त्यांच्यासाठी सरकरानेच काहीतरी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.