बेंगळुरू – कॉंग्रेस आणि जेडी(एस) हे घराणेशाही पक्ष आहेत, जे सर्वसामान्य लोकांसाठी काहीही करू शकत नाहीत. आता भाजप कर्नाटकात पूर्ण बहुमतासाठी लढत आहे. कमळ पुन्हा फुलवण्याचा कर्नाटकातील जनतेचा निर्धार आहे. एका बाजूला मोदीजींची भाजप आणि दुसऱ्या बाजूला राहुल बाबांची (गांधींची) तुकडे गॅंग कॉंग्रेस आहे, असे प्रतिपादन कर्नाटकातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी बी. एस. येडियुरप्पा यांना संधी द्या, आम्ही तुम्हाला भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ, असे शहा म्हणाले. कॉंग्रेस आणि जेडीएस हे कौटुंबिक पक्ष आहेत. ते कधीही सामान्य लोकांचे हित साधू शकणार नाहीत आणि गरिबीत जगणाऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करू शकणार नाहीत. जेडीएसला दिलेले तुमचे प्रत्येक मत कॉंग्रेसला जाणार आहे. कॉंग्रेसला दिलेले प्रत्येक मत सिद्धरामय्या आणि दिल्लीतील त्यांच्या एटीएम सरकारला जाणार आहे. मोदी सरकारने पीएफआयवर बंदी घातली आहे. पण, कॉंग्रेस सत्तेत असताना पीएफआयविरुद्धचे 1700 खटले मागे घेण्यात आले, हे विसरु नका.
डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या… दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी लढत आहेत. त्यांच्या लढ्याचा कर्नाटकला फायदा होणार नाही. कर्नाटकचे कल्याण करायचे असेल, तर राज्यात भाजपचे सरकार स्थापन करावे लागेल, तरच राज्याचा विकास होईल असे सांगून शहा पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी दावा केला होता की, जर काश्मीरमधील कलम-370 रद्द केले तर देशभर रक्तपात होईल. पण ही सर्व प्रक्रिया होत असताना एक दगडही कुणी फेकला नाही, याचा अर्थ संपूर्ण देशाला हा निर्णय मान्य होता.