नवी दिल्ली –देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेवरून कॉंग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांच्यावर जोरदार पलटवार केला. मागील दहा वर्षांचा अन्यायकाळ लवकरच समाप्त होईल. देशातील जनतेने आणि विशेषत: तरूणांनी पंतप्रधान म्हणून लोकसभेतील मोदींचे भाषण अखेरचे ठरवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कॉंग्रेसने म्हटले.
मोदींनी सोमवारी लोकसभेतील भाषणात विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यांनी नेहरूंवरही निशाणा साधला. नेहरू भारतीयांना आळशी आणि कमी हुशार मानत असल्याची टिप्पणी त्यांनी केली. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. मोदी भुषवत असलेल्या पदाचा अवमान करत आहेत.
भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी या ज्येष्ठ नेत्यांनी कधीच तसे केले नाही. मोदी असुरक्षितता आणि हीनभावनेने ग्रस्त आहेत. अहंकाराची परमोच्च सीमा आणि नेहरूंची धास्ती हे खतरनाक मिश्रण आहे. ते लोकशाहीच्या हत्येचे कारण बनत आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदींच्या मनात कटूता-प्रियंका गांधी
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदींवर टीकास्त्र सोडताना नेहरूंच्या भाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावरून शेअर केले. भाषणातील काही वाक्ये चुकीच्या पद्धतीने सादर करणे लज्जास्पद आहे. त्यातून मोदींच्या मनातील कटूता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया प्रियंका यांनी दिली.