Nana Patole : जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर आता राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, अश्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली भावना व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे. निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते.
त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे’, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.