नवी दिल्ली : दिल्लीमधील सीमापुरी भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी रात्री गाढ झोपेत असणाऱ्या लोकांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत तिघे जखमी आहेत. पीडित दुभाजकावर झोपलेले असताना ट्रकने त्यांना चिरडले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहे.
पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. चौघांना उपचारासाठी तात्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एकाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला, तर एका व्यक्तीने उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला.
सीमापुरी भागात रात्री १ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकावर झोपलेले असताना भऱधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. दोघांचा घटनास्थळी तर तिसऱ्याचा रुग्णालयात जाताना आणि चौथ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्यांची ओळख पटली अशून करीम (५२), छोटे खान (२५), शाह आलम (३८), राहुल (४५) अशी त्यांची नावं आहेत. १६ वर्षीय मनिष आणि ३० वर्षीय प्रदीप जखमी आहेत. वाहनाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.