नवी दिल्ली – अवयव दानाबाबत लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करून या अत्यंत महत्वाच्या मुद्याबाबत धार्मिक नेते आणि माध्यमांनी जागृती निर्माण करावी आणि त्या द्वारे लोकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. दधिची देहदान समितीतर्फे आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शरीर अवयव दानासंदर्भात राष्ट्रीय अभियानाच्या प्रसंगी उपस्थित मेळाव्यास ते संबोधित करत होते.
उपराष्ट्रपतींनी (Vice-president Jagdeep Dhankhar)अवयव दान हा अत्यंत संवेदनशील मुददा असून अवयव दानासाठी एक आधारभूत व्यवस्था तयार करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. या संदर्भात दधिची देहदान समितीने अत्यंत योग्य अशी परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रशंसा करून त्यांनी हे प्रयत्न कौटुंबिक स्तरापर्यंत पोहचले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या अभियानात माध्यमे आणि समाजमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या चांगल्या अर्थाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक माध्यमातील व्यक्तीने योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले.
महर्षी दधिची जयंतीदिनाच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा देताना आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि समाजाला त्याचे देणे परत करण्यासाठी या महान ऋषीचे जीवन आणि तत्वज्ञान अनुसरावे, असे आवाहनही धनखड यांनी केले.