कोल्हापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह देशभर जात आणि धर्माच्या नावावर मानवी समाजात दुही निर्माण करण्याचे नवे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेसाठी खालची पातळी गाठली जात आहे. हिंदुत्वाच नव सोंग घेऊन भारतीय संविधानाला धक्का पोहचवण्याचे काम सुरु आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशत मजवण्याचे काम सरू आहे. या हिंदुत्वाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जानेवारीत कोल्हापूरची शाहू नगरी ते मुंबईच्या चैत्य भूमीपर्यंत लॉंग मार्च काढणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.
या लॉंग मार्चमध्ये राज्यातून पंचवीस हजार लोक होणार सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान फौंडेशन यांच्या वतीने आयोजित अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्रातील कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत, कलावंत व संवेदनशील कार्यकर्ते यांच्याकडून ग्रंथतुला व 75 हजार संघर्ष निधी देऊन प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा जाहीर नागरी सत्कार राजर्षी शाहू स्मारक भवन, सभागृह, कोल्हापूर येथे लेखक व समीक्षक डॉ. गिरीश मोरे व ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांना देण्यात आलेला 75 हजार संघर्ष निधी व त्यात स्वतः जवळचे 25 हजार व भूपाल शेट्टी यांनी दिलेले 25 हजार असा एक लाख पंचवीस हजार रुपयांचा संघर्ष निधी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला जाहीररित्या देण्यात आला.