आढळराव पाटील यांचा गावभेट दौऱ्यात संवाद
आळंदी म्हातोबाची येथे प्रचारात तरूणांचा सहभाग
शिंदवणे – लोकसंग्रहात राहून कामे केल्याने विकासकामे मार्गी लागली. मी ज्या ज्या गावात गेलो तेथे विकासकामे केली, त्यामुळेच तीनवेळा जनता पाठीशी राहिल्याचे प्रतिपादन महायुतीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे गावभेट प्रचार दौऱ्यादरम्यान मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद म्हणाले की, टीव्ही सिरीयलमध्ये भूमिका साकारून निवडून आलेले खासदार डॉ. कोल्हे हे दिल्लीला गेले, मात्र, त्यांनी रयतेला वाऱ्यावर सोडले. पण गावखेड्यांत वाड्या वस्त्यांवर सातत्याने येणारी व्यक्ती म्हणजे केवळ शिवाजीराव आढळराव पाटील सातत्याने राहिले आहेत. नुसतं बोलण्यापेक्षा कृतीतून विकासकामे करणारे ते नेतृत्व म्हणजे दादा आहेत. शिरुरला त्यांच्या नेतृत्वामुळे ७० कोटींची पाणी योजना मिळाली हे विसरुन चालणार नाही असे त्यांनी नमूद केले.
तरूणाईचा प्रतिसाद याप्रचार भेट दौऱ्यात उल्लेखनीय होता. तुमच्या हातून आमच्या गावचा विकास व्हावा असा सूर यावेळी विविध गावातील ग्रामस्थांनी आढळराव पाटील यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, कुस्तीगीर संघटनेचे संदीप भोंडवे, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, पुणे महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके, माजी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरूण गिरे, यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक संजय कांचन, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, भाजपा तालुकाअध्यक्ष शाम गावडे,
यशवंत सहकारी कारखान्याचे संचालक शशिकांत चौधरी, उपसंचालक मोरेश्वर काळे, शिवसेना तालुकाप्रमुख विपुल शितोळे, पक्षाच्या भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनम चौधरी, राष्ट्रवादी युवाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी, अर्चना कटके, ज्योती थोरात, सुनील कांचन पाटील, जिल्हा संघटक निलेश काळभोर, उप जिल्हाप्रमुख शामराव माने, उप तालुका प्रमुख पारस वाल्हेकर, सरपंच स्नेहल चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, अमित कांचन, अण्णा महाडिक उपस्थित होते.
बैलगाडीतून वाजत- गाजत स्वागत
हवेली तालुक्यातील शिंदवणे गावामध्ये शिवाजीराव आढळराव यांची ‘एन्ट्री’ होताच ग्रामस्थांनी त्यांची बैलगाडीवरून वाजत गाजत मिरवणूक काढत मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी,ढोल ताशा सनईच्या गजरात त्यांचे झालेले स्वागतामध्ये एक आगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.