कोलंबो : श्रीलंकेत मागच्या काही दिवसांपासून महागाई आणि अन्नासाठी लोकांचे हाल होत असताना पाहायला मिळत आहे. त्याविषयीच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. दरम्यान, देशातील हे हाल सोसवत नसल्यामुळे भारतात येणाऱ्या श्रीलंकन नागरिकांची संख्या झपाटयाने वाढत आहे. याविषयीचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
गेल्या आठवड्यात तमिळनाडूमध्ये श्रीलंकेतून निघून आलेल्या लोकांची संख्या अचानक वाढली. श्रीलंका सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात आहे. एप्रिल २०१९ च्या इस्टर संडेला झालेले स्फोट, करोना महामारीच्या दोन लाटा आणि रशिया युक्रेन युद्ध या सगळ्यामुळे श्रीलंका डबघाईस आली आहे.
इंधनाच्या तुटवड्यामुळे नागिरकांना अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. परदेशांमध्ये असलेल्या आपल्या लेकरांना पैसे पाठवणं शक्य होत नाहीये, कारण सगळी डॉलर खाती गोठवण्यात आली आहेत. खासगी बससेवा बंद झाल्या आहेत, सरकारी सेवांवर प्रचंड ताण येत आहे आणि रेल्वे सुविधेवरही भीषण परिणाम होतोय. माध्यमांनाही खर्च परवडत नसल्याने वर्तमानपत्रांची पानं कमी करण्यात आली आहेत.
कोलंबोतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक नागरिकाला या संकटामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सरकार लोकांना घरूनच काम करण्याचं आवाहन करत आहे. पण लोडशेडिंगची भीषण समस्या भेडसावत आहे. हॉस्पिटल्स बंद करण्याची वेळ आलीये कारण जनरेटर्ससाठी डिझेल नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.