मुंबई – घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मुंबईतील पंजाब ऍन्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या संबंधात आज अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली.
ही चर्चा विधायक स्वरूपाची झाली अशी माहिती शरद पवारांनी आपल्या ट्विटर अकौंटवर दिली. या बॅंकेत 6700 कोटी रूपयांचा कर्ज घोटाळा झाला आहे. त्यामुळे बॅंकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी आता बॅंकेकडे पैसेच उरलेले नाहीत. रिझर्व्ह बॅंकेनेही या बॅंकेतून पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत. या बॅंकेतील घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून या शाखेने या प्रकरणात नुकतेच 32 हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले आहे.