नांदेड : खराब रस्त्यांमुळे अनेकवेळा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो मात्र नांदेड जिल्ह्यात याच खराब रस्त्याने एका वडिलांचा बळी घेतला आहे, ज्याच्यावर त्याच्या ४ चिमुकल्या मुलींची जबाबदारी होती. खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाच्या धावत्या बसचे दाराचे हूक तुटून दरवाजा उघडला गेल्याने एका प्रवाशाचा बसमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथे रविवारी सकाळी घडली आहे.
लक्ष्मण शेषेराव गायकवाड (40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चालत्या एसटी बसमधून पडल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाला. आंबुलगा येथून सावरगावला जाण्यासाठी लक्ष्मण शेषराव गायकवाड (रा. कल्लाळी) हे कंधार-मुखेड बसमध्ये चढले. गर्दीमुळे ते बसच्या दरवाजाजवळ उभे होते.
आंबुलगापासून सावरगावपर्यंतचा रस्ता खराब असून शेल्लाळी पाटीजवळ बसचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामुळे लक्ष्मण गायकवाड हे खाली पडले आणि बसचे मागचे चाक अंगावरून गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, चार बहिणी, दोन भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.एस. पडवळ हे करत आहेत.
दरम्यान, लक्ष्मण शेषेराव गायकवाड यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी आठवीला आहे तर तिच्या पेक्षा आणखी तीन लहान आहेत. वीट भट्टीवर रोजंदारीवर आणि मिळेल ते रोजगार करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. आंबुलगा येथील साडूभाऊ यांना भेटून सावरगाव येथे सासरवाडीला जात होते. पण याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि चार मुलीच्या डोक्यावरुन वडीलाचे छत्र हरपले आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.