Parbhani Accident : परभणीत शनिवार हा काही भाविकांसाठी घातवार ठरला आहे. कारण परभणीच्या यशवाडी या गावच्या मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात होऊन यात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा मोठा होता कि, अडकलेल्या क्रूजरला जेसीबीने बाहेर काढावे लागले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण 9 जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे काही भाविक परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दर्शन झाल्यावर हे भाविक पुन्हा जालना जिल्ह्याकडे परत निघाले होते. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरु असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर 6 भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. सोबतच, जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला केले.