नगर -जिल्ह्यातील प्रश्न लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने जिल्हा विकासासाठी कार्यरत राहू. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अधिकारी व कर्मतारी तसेच जिल्हावासियांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यात चांगले काम करु शकलो, अशी भावना मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. भोसले यांचे स्वागत व मावळते जिल्हाधिकारी द्विवेदी यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल प्रशासनातील विविध अधिकारी-कर्मचारी यांची यावेळी उपस्थित होते.
मावळते जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, “जिल्ह्यातील कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणूक, टंचाई, अतिवृष्टी यासारख्या विविध आव्हानांचा सामना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण करु शकलो, याचे समाधान आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या या जिल्ह्यात काम करताना नेहमीच कामाला प्राधान्य दिल्याने नागरिकांचे सहकार्य मिळाले. करोनासारख्या आव्हानांचा सामना करताना जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात ठेवता आल्याचे समाधान मिळाले.” अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांनी द्विवेदी यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडल्याचे सांगितले.
नवीन जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळातही सर्व अधिकारी-कर्मचारी त्यांच्या नेतृत्वात विकास प्रक्रियेत काम करतील, असा विश्वास दिला. निवासी उपजिल्हाधिकारी निचीत यांनी द्विवेदी यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगितल्या. करोनाकाळात त्यांनी स्व:त नेतृत्व करुन प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार ज्योती देवरे, तहसीलदार अमोल निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.
बुके नको बुक्स द्या!
नूतन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे स्वागत करण्यासाठी अधिकारी वर्गासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आदी आले होते. त्यांनी येताना फुलांचे गुच्छ आणले होते. मात्र, डॉ. भोसले यांनी आता यापुढे असे गुच्छ (बुके) नकोत, तर पुस्तके (बुक्स) द्या, असे आवाहन केले.सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे