दुबई – आयसीसीने 2010 ते 2020 या दशकातल्या सर्वोत्तम टी-20, एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. या तिन्ही संघामध्ये भारताचा रनमशीन विराट कोहलीनेच वर्चस्व राखले आहे. त्याचा समावेश तीनही प्रकारच्या क्रिकेट संघात करण्यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला तीनपैकी एकाही संघात स्थान मिळालेले नाही.
दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी आयसीसीने लाखो क्रिकेटप्रेमींकडून मते मागवली होती. याच पाहणीचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला आहे. या संघामध्ये पाकिस्तानधील एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.
पाकिस्तानी चाहत्यांनी यासाठी बीसीसीआयला जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी आयसीसीवरही टीका केली आहे. बीसीसीआयच्या दबावाखाली आयसीसीने संघाची निवड केल्याचा आरोप पाकिस्तानी चाहत्यांनी केला आहे. रशीद खान आणि जसप्रीत बुमराह यांनी गेल्या काही वर्षात पदार्पण केलेले असूनही दशकातील सर्वोत्तम संघात त्यांची निवड कशी झाली, असा प्रश्नही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
एकदिवसीय तसेच टी-20 संघाच्या कर्णधारपदी माजी कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनीची निवड झाली आहे. तर कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.