नवी दिल्ली – खलिस्तानवादी दहशतवादी सुख भिखरीवाल याचे गुरूवारी दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावर पोलिसांनी अटक केली. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी तो काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
पंजाबमध्ये पुन्हा खलिस्तानवादी दहशतवादाने डोके वर काढावे, असे पाकिस्तानचे नापाक मनसुबे आहेत. त्यातून काही महत्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचा कट आयएसआयने रचल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली.
त्या माहितीमुळे सुख भारतीय यंत्रणांच्या रडारवर आला. भारतीय यंत्रणांनी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) प्रशासनाशी संपर्क साधून सुख याच्या प्रत्यार्पणाची निश्चिती केली. आता त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये शौर्य चक्र विजेते बलविंदर संधू यांची हत्या झाली. त्यांनी काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये फैलावलेल्या दहशतवादाविरोधात निर्धाराने लढा दिला. त्यांच्या हत्येत सुख सामील असल्याचा संशय आहे. भारतात मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश आहे. त्यामुळे तो जाळ्यात येणे भारतीय यंत्रणांच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे.