– विनोद मोहिते
इस्लामपूर – “रक्तदान श्रेष्ठदान ” ही केवळ घोषणा न देता सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवत २२६ जणांनी रक्तदान करून नववर्षाची सुरुवात केली. येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते ” नववर्षाचे स्वागत रक्तदानाने ” या उपक्रमाचे ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त टंचाई वर मात करण्यासाठी तरुणाईने प्रतिसाद दिला.
नविन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण नवनवे संकल्प करीत असतात. पण ते काही दिवस टिकून राहतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. यात महिला पण आघाडीवर होत्या. ” रक्तदान श्रेष्ठदान ” याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रयत्न करतात. नव्या पिढीला सामाजिक उपक्रमांची जाणीव करून देण्यात पुढाकार घेतात.
या जाणिवेतून पाच वर्षांपूर्वी ” नववर्षाचे स्वागत रक्तदानाने ” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला .आणि मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी तो मनावर घेतला. आणि लगेचच कृतीत आणला. पाच वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक बाजूला ३१ डिसेंबर धुमधडाक्यात साजरा करण्यात व्यस्त असणारी तरूणाई. आणि एक जानेवारीला नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्यासाठी झटणारे मंडळाचे कार्यकर्ते ३१ च्या रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीरासाठी मंडप घालताना दिसले.
आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व इस्लामपूर नगरीचे नगरसेवक आनंदराव पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . ते म्हणाले ” रक्ताच्या नात्या पलीकडे जावून नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबीरे उपयुक्त ठरतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण एकमेकांना भेटतो, पण आज रक्तदानाने दिलेल्या रक्ताच्या एका पिशवीतुन चार रुग्णांना आयुष्याची भेट दिली गेली.
सामाजिक जाणिवेतून आज अनेकांनी रक्तदान केले. आम्ही या रक्तदात्याना सन्मान करीत छोटी भेट वस्तू दिली.” राजरामबापू रक्तपेढी आणि यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले.
मंडळाचे सदस्य धोंडीराम घोरपडे (पुजारी) भाऊ पाटील , श्रीकांत काळे, श्यामजी पटेल. डॉ. दिलीप साळुंखे ,डॉ उदय माने, संदीप पवार , विजय घोरपडे , विजय धुमाळे, तुषार खंडागळे , प्रितम काळे, शिवराज पुजारी, सुरज पन्हाळकर, गणेश खंडागळे ,सागर भोजुगडे ,अनंत नाईक, चंद्रकांत शिंदे , निलेश जगताप आशिष कुकडे निलेश पवार कपिल डांगे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन संदेश शहा व प्रशांत घोरपडे यांनी केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससचा वापर करून आजचे रक्तदान शिबिर झाले. गेल्या नऊ महिन्यात कोरोना मुळे रक्त तुटवडा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिबीर झाले.
श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपुर या मंडळाचे विविध उपक्रम स्तुत्य आहेत. कोरोनाच्या काळात मंडळाने आपली रुग्णवाहिका कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. नव्या वर्षात पहिल्या दिवशी सामजिक बांधीलकी जोपासली गेली.