सादिक सय्यद
पाचगणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील जन्मगावी दरे तांबपासून दुर्गम कांदाटी खोऱ्यातील शिंदी ते चतुरबेट परिसरात 25 हून जास्त विजेचे खांब पडल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जनता अंधारात आहे. दुर्गम व डोगराळ कांदाटी खोऱ्यात वीज नाही, मोबाइलचे भारत संचार निगम लिमेटडंचं फक्त एकमेव नेटवर्क मात्र, तेही जोराच्या पावसात गायब झाल्यामुळे कांदाटीची जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आर्त हाक देत “नाही लाईट, नाही नेटवर्क,’ मुख्यमंत्री महोदय सांगा जगायच कसं, असा प्रश्न विचारत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी व बामणोली भागात पावसाचा जोर वाढला आहे. कांदाटी व बामणोली विभागातील मोबाइल नेटवर्क असलेल्या भारत संचार निगम लिमेटडची सेवा कोलमडली आहे. सर्वसामान्यांना कोणतेही नेटवर्क मिळत नसल्याने डिजीटल युगातही मुख्यमंत्र्यांच्या भागाची ससेहोलपट थांबता थांबत नाही. कोयना जलाशयातून वीज निर्माण होते. मात्र, त्याच विजेपासून कांदाटी खोऱ्यातील जनता वंचित राहत आहे. पावसाचा जोर वाढल्याने कांदाटी खोर ते बामणोली विभाग व शिंदी विभागातील 25 ते 30 महावितरणाचे विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.
महावितरण कंपनीचे ठेकेदार निकृष्ठ काम, निकृष्ट साहित्य, महावितरणच्या अधिकाऱ्यांची खाबुगिरी व टक्केवारीमुळे विद्युत विभागाचे खांब पावसात तग धरत नसल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. कांदाटी खोऱ्यामध्ये काम करताना विद्युत विभागालासुद्धा साहित्याच्या वाहतुकीकरता तारेवरची कसरत करावी लागते.
अशा बिकट परिस्थितीत वीज खांबाचं निकृष्ट काम होत असल्यामुळे अति पावसात विद्युत खांब उन्मळुन पडले. दिवसेदिवस कांदाटी खोऱ्याची परिस्थिती सर्वसामान्यांसाठी मुलभूत सुविधांची वाणवा काही संपत नसल्याचे चित्र आहे. राज्याचे नेतृत्व सध्या कांदाटी भागाचे सुपुत्र एकनाथ शिंदे करत आहेत. डिजीटल युग सुरु आह.े मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कांदाटी खोरं आजही नेटवर्कहीन अन् अंधारात आहे. ठाण्यासारख्या महानगरामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महाबळेश्वरच्या सुपुत्राकडून कांदाटी खोऱ्यातील दळणवळण, नेटवर्क व वीज या मुलभूत सुविधांची वाणवा संपवली जावी, अशी अपेक्षा दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.