मुंबई – करोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून करोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील करोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. करोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहोचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, करोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात आरोग्य, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.