मुंबई – हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
मुंबईत “बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिंदुत्व, हनुमान चालिसा अशा विविध मुद्द्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपावर सडकून टीका करताना लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या घरात जर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर तुम्ही घरी येऊन बोलू शकता. पण त्याला एक पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की, साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो वा नसो साधूसंत हे येतच असतात. शिवसेना प्रमुख होते आणि मा सुद्धा होती. त्यावेळीही येत होते. पण ते नीट बोलू सांगून येतात. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्वाच्या व्याख्येतून समजावून सांगितलेले आहे. त्यामुळे जास्त काहीही बोलण्याची माझी इच्छा नाही. परंतु एक जाहीर सभा घेण्याचा माझा इरादा आहे. राज्यात जे काही चालले आहे, त्याला उत्तर देण्यासाठी लवकरच सभा घेऊ, असे ते म्हणाले.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणजे नेमकं काय सोडले. हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? घातलं, नेसलं आणि सोडलं. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. त्यांनी एक गोष्टी लक्षात ठेवायला पाहीजे की, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले. ज्यावेळी बाबरी पाडली गेली होती. त्यावेळी सुद्धा तुम्ही बिळात लपला होता. राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुमच्यासारख्या लोकांनी घेतलेला नसून न्यायालयाने घेतलेला आहे. राम मंदिर बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.