मुंबई – लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एकाच संघाविरुद्ध तीन शतके फटकावणारा राहुल पहिलाच फलंदाज ठरला आहे.
राहुलने या मोसमात मुंबईविरुद्ध नाबाद 103 धावांची खेळी केली. त्यापूर्वी 2019 साली राहुलने मुंबईविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस गेलने पंजाब किंग्ज, विराट कोहलीने गुजरात लायन्स आणि डेव्हिड वॉर्नरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रत्येकी दोन शतके फटकावलेली आहेत.
राहुल भारतासाठी सर्वाधिक टी-20 शतके साकार करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये राहुलने आतापर्यंत सहा शतके फटकावली आहेत. त्याने आयपीएलमध्ये चार शतके साकार केली आहेत. भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्माने सहा, तर विराट कोहलीने पाच शतके केली आहेत.
कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध दोन शतके करणारा राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी कोहलीने हा पराक्रम रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार असताना गुजरात लायन्सविरुद्ध दोन शतके झळकावली होती.