पणजी – निवडणूक जाहीरनाम्यात कॉंग्रेस तर्फे जी आश्वासने दिली जातात ती पोकळ नसतात, ती थेट हमीच असते असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. दक्षिण गोव्यात राहुल गांधी यांनी आज तेथील मच्छिमारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपकडून द्वेष पसरवला जातो आणि समाजात भेदभाव निर्माण केला जातो पण आम्ही मात्र प्रेम आणि सद्भावना पसरवण्याचे काम करतो असे त्यांनी नमूद केले. लोकांना एकत्र करून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो असे ते म्हणाले.
प्रत्येक भारतीयाला त्याची संधी आणि वाव दिला गेला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असेही त्यांनी नमूद केले. मी आज येथे तुमचा किंवा माझा वेळ वाया घालवण्यासाठी आलेलो नाही. आम्ही येथील निवडणूक जाहीरनाम्यात जी आश्वासने देतो ते आमचे एक वचनच आहे, ती आश्वासने पुर्ण होण्याची हमी आम्ही देत आहोत असेही त्यांनी नमूद केले.
मला माझी विश्वासार्हता जपायची आहे. मी जे आश्वासन देतो ते पुर्ण झाले नाही तर पुढच्यावेळी येथे तुमच्यासमोर येताना मला काही विश्वासार्हता राहणार नाही. मी असे करू इच्छित नाही असे ते म्हणाले. आम्ही छत्तीसगड मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन आम्ही तातडीने पुर्ण केले आहे.
पंजाब आणि कर्नाटकातही आम्ही आमची वचने पाळली आहेत, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही बाब समजून येईल असे ते म्हणाले. गोव्यात पुढील वर्षाच्या सुरूवातीला निवडणूका होणार आहेत. त्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी येथे आले आहेत.