मुंबई – करोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही. यामुळे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई दिली.
राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उद्योगमंत्र्यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली. याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते. यावेळी कंटेनमेंट झोन परिसरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या उद्योगांसोबत इतर उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.
विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
सुभाष देसाई म्हणाले, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगचक्र पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
करोनाचा प्रसार रोखणे, सॅनिटायझेन, वाहतूक व्यवस्था आदी बाबीं पाळणे आवश्यक आहे. मुंबई व परिसरात ज्या भागांत करोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असेही त्यांनी सांगितले.