नगर -भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनूसार आज दि.5 व उद्या दि.6 या दोन दिवसात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आजअखेर 448.5 मि.मी. म्हणजे 99.2 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज सकाळी जिल्ह्यातून वाहणाऱ्या भिमा नदीस दौड पुल येथे 2 हजार 223 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच कर्जत तालुक्यातील सीना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून धरणाचे सांडव्याव्दारे 157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढ् नाल्यांवरीलर पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट-मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी, वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथील दुरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क, असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.