अयोध्या – अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समविचारी संघटनांनी सुमारे 30 वर्षांच्या संघर्ष केला, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मला आठवतंय, तत्कालीन सरसंघचालक आम्हाला सांगत असत आपल्याला आणखी 20-30 वर्ष संघर्ष करावा लागेल, त्यानंतर आपली इच्छा पूर्ण होईल. आम्ही 30 वर्ष संघर्ष केला आणि आमचा ठाराव पूर्ण झाल्याचा आनंद 30 व्या वर्षी मिळवत आहोत, असे भागवत म्हणाले. रामजन्मभूमी सोहोळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्यानंतर ते बोलत होते.
भागवत म्हणाले, अयोध्येतील मंदिरासाठी अनेकांनी त्याग केला आहे. आता येथे बांधकाम सुरू होत असल्याने देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. अनेक जणांनी या मंदिरासाठी त्याग केला मात्र ते आज येथे उपस्थित राहू शकले नाहीत.
भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आणि विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करून ते म्हणाले, अनेक जणांची इच्छा असूनही करोनाच्या साथीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत तरी, मनाने ते येथेच असतील अशी मला खात्री आहे. अडवाणींसह सर्व जण आपल्या घरातून हा सोहोळा पहात असतील याची मला खात्री आहे. स्वप्नपुर्तीचा आनंद ते लुटत असतील.
देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचे त्यांनी कौतूक केले. या दिवसामुळे आत्मनिर्भर भारताचा विश्वास निर्माण होईल. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर देशाचा दृढ विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.