पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होऊन बराच काळ लोटला आहे. तरी देखील दोन्हीकडील मित्रपक्ष मात्र सक्रिय झाले नव्हते. अनेक प्रचार कार्यक्रम गर्दीविना सुने झाले होते. उमेदवारीसाठी इच्डछुक असलेले अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.
मित्र पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उमेदवाराच्या नावाने समाजमाध्यमावर साधी पोस्ट देखील टाकत नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांत अचानकच घटक पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून बैठका सुरू झाल्या आहेत. स्थानिक पदाधिकार्यांची नाराजी खरोखरच दूर झाली आहे की वरिष्ठांकडून तंबी आली आहे ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक प्रचंड नीरस झालेली पहावयास मिळाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पहिल्यादांच रंगत असताना दोन्हीकडील मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्यांनी आणि पर्यायाने कार्यकर्त्यांनी उमेदवारांकडे पाठ फिरवली होती.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन्हीकडील वरिष्ठ नेते हजर होते. दोन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाचे प्रयत्न केले परंतु शक्ती कमी पडत असल्याचे वरिष्ठांच्या नजरेतून चुकले नाही. त्यानंतर सूत्रे हलण्यास सुरुवात झाली.
पहिल्यांदा एवढे शांत वातावरण
मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीचा प्रचार खूपच चुरशीचा होता. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या चर्चा व्हायच्या. परंतु पहिल्यांदाच या मतदारसंघातील वातावरण अत्यंत शांत वातावरण आहे. ना आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्या झडत आहेत, ना कुठे उमेदवारांबाबत चर्चा होत आहे. 2009 साली स्व. गजानन बाबर विरोधात आझम पानसरे यांच्यातील लढतीने मावळ लोकसभा मतदारसंघाची वाटचाल सुरू झाली.
तेव्हाही प्रचार शिगेला पोहचला होता. 2014 साली स्व. लक्ष्मण जगताप विरोधात श्रीरंग बारणे ही निवडणूक देखील चुरशीची ठरली. तेव्हाही दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत वेगळेच वातावरण निर्माण केले होते. 2019 साली अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारच मैदानात उतरल्याने निवडणुकीची रंगतच वेगळी होती.
2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कडवी झुंज देत प्रचार जोमात ठेवला होता. या निवडणुकीत मात्र ना पदाधिकार्यांमध्ये उत्साह दिसत आहे ना कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. ही परिस्थिती देखील राज्य पातळीवरील वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात आल्याचे समजते.
…तर पक्ष वेगळा विचार करु शकतो
2024ची लोकसभा निवडणूक भाजप देशभरात पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. तर विरोधकांनी एकजूट दाखवित अनेक पक्षांची मोट बांधली आहे. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळेच चित्र होते. एक एक सीट यंदा महत्त्वाची असल्याने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरुन लक्ष ठेवले जात आहे.
पदाधिकार्यांनी उमेदवाराबाबतची नाराजी दूर केली नाही तर आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाकडून वेगळा विचारही होऊ शकतो, असे काही पदाधिकारी सांगत आहेत. प्रत्येक प्रभाग आणि विधानसभा क्षेत्रात होणार्या मतदानावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे आणि त्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.