पुणे – राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टी पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
1 Aug: बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression).संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता
नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता
पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD pic.twitter.com/NNYa9YFtJK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2023
बुधवारी म्हणजे 2 ऑगस्ट रोजी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरूवार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. शुक्रवारी मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.