सातारा – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या बांधणीपूर्वी अडीच वर्षांपूर्वी पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेच सांगू शकतात. त्या दोघांनाच याविषयी माहिती आहे. ते या शपथविधीविषयी काही बोलत नाहीत. त्यामुळे आपण उगाच राजकीय अंदाज बांधून वक्तव्य करणे चुकीची आहे, अशी मार्मिक शैलीतील फटकेबाजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार रोहित पवार प्रथमच सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी नायगाव (ता. खंडाळा) या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट दिली. साताऱ्यात पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यकारणी सदस्य ऍड. कमलेश पिसाळ, निशांत गवळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. पहाटेच्या शपथविधी ही शरद पवार यांची खेळी होती व त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झाला, असे जयंत पाटील म्हणाल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर रोहित पवार म्हणाले, “”जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काम चांगले सुरू आहे. ते जे बोलत असतात त्याचे अनेक संदर्भ आहेत.””
सरकार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असतो. कोणतेही सरकार 40 लोकांसाठी चालवले जात नाही तर ते 13 कोटी महाराष्ट्रासाठी चालवलं पाहिजे. ही सत्तेतल्या लोकांनी समजून घ्यावे,’ असा मार्मिक टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला. पवार म्हणाले, “”राजकीय भूकंप करण्याची क्षमता जनतेमध्ये आहे. त्यामुळे यापुढे ज्या विधानसभा- लोकसभा निवडणुका होतील, त्यामध्ये लोकचं त्यांच्या इच्छेने राजकीय भूकंप घडवून आणतील. जे लोक महाराष्ट्राबाहेर जाऊन सत्ताबदल करतात. त्यांच्यातील असंतुष्टांमुळेच कदाचित झाला तर भूकंप होऊ शकतो.” विरोधातील लोक सत्तेत आणि सत्तेचे लोक विरोधातही जाऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पार्थ पवार यांच्या नाराजीवर रोहित पवार म्हणाले, “पार्थ माझा भाऊ आहे. आम्ही वेळोवेळी चर्चा करतो. जे कोण बोलत आहेत त्यांना अजून पवार कळाले नाहीत. तसेच त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळालेला नाही. त्यामुळे पवार ही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. बारामतीचा मतदारसंघ त्यांच्यासाठी असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत.”
जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देणार
महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचा समावेश असून महिला क्रिकेटमध्येही ग्रामीण भागातील मुली पुढे जात आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये लेदर बॉलचे क्रिकेट लॉन लवकरच निर्माण केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना पारदर्शी पद्धतीने गुणवत्तेनुसार निश्चितच संधी दिली जाईल. असेही पवार यांनी स्पष्ट केले.