इंदापूर -हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातच इतकी मोठी शक्ती आहे की, प्रेरणा हे नाव उच्चारताच मिळते. सामान्य माणसाच्या, समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र काम करून, कायमचा आदर्श देशापुढे नाही तर, जगापुढे ठेवण्याची किमया बाळासाहेब ठाकरे यांनी केली, असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
स्वाभिमानी युवा संमेलन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आयोजित जीवन ज्योत अपंग संस्था व ऍड. नितीन कदम मित्र मंडळ शिरसटवाडी यांच्या वतीने शिवसंग्राम व्याख्यानमाला झाली. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे युवा काल, आज आणि उद्या व्याख्यान पार पडले. यावेळी दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, गावचे सरपंच नाना रावण, बापूराव बल्लाळ, अक्षय कदम, सचिन कदम, आनंता दांगट, स्वप्नील कदम, अमर बोराटे, कांतीलाल रणमोडे, संतोष सांळुखे,
बाळासाहेब पवार, संग्रामसिंह कदम, मंगेश माने, पांडुरंग पानसरे, अतुल जाधव, फिरोजपठाण, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब जगताप, चेअरमन किशोर पवार, गणेश शेळके, महेंद्र रेडके, शंकरराव कदम, सुदर्शन रणवरे, युवराज मोरे, विष्णु पवार यांसह मान्यवर उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले, प्रत्येक गावामध्ये चांगलं काम करणारी माणसं असतात; मात्र ती जनतेने वेळीच ओळखली पाहिजेत. काम करणाऱ्या माणसाला नुसती पाठीवर थाप दिली तरी, पुढे सामाजिक कामाचा वेग वाढतो. सिमाज उपयोगी कामासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, खंबीर पाठीशी कायम उभा राहील अशीही ग्वाही भरणे यांनी दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्यामुळे, समाज उपयोगी, लोकोपयोगी कामे करताना अधिकची ताकद मिळते. 17 वर्षे शिरसटवाडी गावकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त विचारांची मेजवानी मिळावी, म्हणून असे उपक्रम संस्था राबवते. याला गावकऱ्यांची साथ मिळते. आगामी काळात असेच उपक्रम अखंड सुरू राहतील.
-ऍड. नितीन कदम, व्याख्यानमालेचे आयोजक