पिंपरी – मागील महिन्यापासून बाजारात कांद्याचे दर चढेच आहेत; परंतु आता बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाले असून काही दिवसांत हे दर आणखी गडगडणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाळी कांद्याच्या हंगामात पावसाने खो घातला होता, त्यामुळे पावसाळी कांद्याच्या पावसाळी कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले; तर उत्पादन घटले होते तसेच हंगामही लांबला होता. त्यामुळेच कांद्याचे दर चढेच होते. मार्चमध्ये उन्हाळी नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात होते, त्या वेळी कांद्याच्या दरात घसरण होत असते. मात्र या वेळी कांदा लागवड अधिक झाली असून, आता उत्पादन वाढत आहे. बाजारात कांद्याची आवक वाढली आहे आणि मागणी कमी आहे. त्यामुळे दर उतरण्याची दाट शक्यता आहे.
महिनभरापासून मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात कांद्याच्या आवकेमध्ये चढ-उतार होत आहे. या बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व परिसरातील भागातून कांद्याची आवक होत असते. 20 फेब्रुवारीला 598 क्विंटल, 27 फेब्रुवारीला 588 क्विंटल आवक तर 6 मार्चला 466 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मात्र, दर 1150 ते 1250 च्या दरम्यान स्थिर राहत आहेत. बाजारात कांदा कमी प्रमाणात असल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर 20 ते 25 रुपयांवर स्थिर आहे. मात्र आता उन्हाळी कांद्याची आवक होऊ लागल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.