नाशिक – कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) सोमवारी कांद्याचा लिलाव रोखून धरला आणि त्यांनी तेथे उग्र आंदोलन केले. कांद्याचे प्रतिकिलो भाव दोन ते चार रुपयांपर्यंत खाली आल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे.
सरकारने तत्काळ कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान जाहीर करावे आणि 15 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची खरेदी करावी, अन्यथा लासलगाव एपीएमसी येथे लिलाव सुरू होऊ देणार नाही, असे कांदा उत्पादकांच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.
सोमवारी लासलगावला आठवडा बाजारात लिलाव प्रक्रिया सुरू होताच कांद्याला किमान 200 रुपये प्रति क्विंटल ते कमाल 800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. आज या बाजारपेठेत कांद्याचा सरासरी भाव चारशे ते साडेचारशे प्रति किंवटल इतका होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली कांद्याचे लिलाव बंद पाडून आंदोलन सुरू केले. शनिवारी या बाजारपेठेत 2,404 क्विंटल कांद्याची आवक झाली आणि भाव किमान 351 रुपये, कमाल 1,231 रुपये आणि सरासरी 625 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता.
राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने कांद्यासाठी तत्काळ 1,500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे आणि सध्या 3,4,5 रुपये प्रतिकिलो भावाने विकला जाणारा कांदा 15 ते 20 रुपये किलो दराने खरेदी करावा, या दोन्ही मागण्या आज मान्य केल्या नाहीत तर लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचे लिलाव अजिबात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे नेते भरत दिघोळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एपीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेत आहेत,आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर दुपारी लिलाव सुरू होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका शेतकऱ्याला त्याचा 512 किलो कांदा जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याला विकून केवळ 2.49 रुपये इतकी किंमत मिळाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठीच अस्वस्था निर्माण झाली आहे.