पारनेर/निघोज – केंद्रीय कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले, म्हणून भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून जाब विचारत होते. पण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात, म्हणून या विरोधाचा मी विचार केला नाही. मात्र, आता शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. मग आता गळ्यात कांद्याच्या माळा घालून फिरणारे गप्प का, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, कांद्याचे दर कोसळण्यात मोदी सरकारच जबाबदार आहे. याबाबत तीन दिवसांत सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
निघोज येथे आ. नीलेश लंके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गोरगरीब व गरजूवंत विद्यार्थ्यांना सात हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. शंभर कुटुंबांना घराच्या धनादेश वाटप करण्यात आले. तसेच बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे नामकरण, विविध विकासकामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे, माजी आ. पोपटराव गावडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ, दादाभाऊ कळमकर, अरूण कडू, माजी आ. राहुल जगताप, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महानगर बॅंकेच्या अध्यक्षा सुमन शेळके, बाबासाहेब कवाद, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, ऍड. प्रताप ढाकणे, सुरेश बापडे, राहुल सागर, घनश्याम शेलार, भैरवनाथ काळे, काकासाहेब कोयटे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, विक्रमसिंह कळमकर, प्रशांत गायकवाड, राणी लंके, कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अमृता रसाळ, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, शेतीमालाला कमी भाव मिळाल्याने अर्थव्यवस्था संकटकाळात जात आहे. यंदा उसाला व कांद्याला भाव नसल्याने बळिराजा संकटात सापडल्याचे पत्र आ. नीलेश लंके यांनी दिले. राज्य व केंद्र सरकार याकडे पहायला तयार नाही. लोकसभेचे अधिवेशन तीन दिवसांनी चालू होणार आहे. त्यात कांदा व उसाबाबत आवाज उठविला जाईल. कांद्याला आठ ते दहा रुपये पिकविण्यासाठी जर खर्च येत असेल, तर दोन-तीन रुपये भाव देऊन सरकार एकप्रकारे कांदा उत्पादकांची चेष्टा करत आहेत. सक्षम नेतृत्व व आदर्श काम आ. नीलेश लंके यांनी केले. सायकलवर बसून लोकांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले आहे. पिढ्यान्पिढ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आ. लंके यांना बळ मिळो, अशी सदिच्छा व शुभेच्छा शरद पवार यांनी आ. लंके दिल्या.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सामान्य कुटुंबातील जन्मलेला व सर्वसामान्यांशी नाळ ठेवणारा आ. नीलेश लंके यांचा आज वाढदिवस असून, पारनेर दुष्काळी तालुका बदलत चालला आहे. त्यामुळे तालुक्यात आ. लंके यांच्या पाठीमागे उभे राहून तालुक्याला यापुढील सुवर्णदिन पहायला मिळणार आहे.
आ. लंके म्हणाले की, शरद पवार तुम्ही परीस आहात. तुमच्यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो. परंतु सामाजिक, राजकीय काम करताना विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शरदचंद्र पवार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे माझे स्वप्न असून, तुम्ही अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माझी मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आ. लंके यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 1100 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहे.
आ. लंके तालुक्यासाठी सुवर्ण माणूस
आ. नीलेश लंके हे पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व करायला लागल्यापासून तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. करोनात हजारोंना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून पारनेरचा नावलौकिक वाढविला आहे. असा संघर्षशील नीलेश लंके सुवर्ण माणूस म्हणून तालुक्याला लाभला, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.