अकोले -अकोले तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे दोनशे एकरची उभी पिके भुईसपाट झाली तर भिंत पडून एक जण दगावल्याची दुर्घटना बुधवारी सांयकाळी लहीत बुद्रुक येथे घडली,अशी माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.
अकोले तालुक्यात सर्वदूर दक्षता घेतली जावी. या हेतूने स्थानिक पातळीवर दवंडी देण्यात आली होती.त्यानुसार लोकांनी निश्चित काळजी घेतली. पण दुर्दैवाने सागर पांडुरंग चौधरी (वय 32, रा लहीत बुद्रुक) या या युवकाच्या अंगावर शेडची भिंत पडून तो जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला संगमनेरला हलवले गेले होते. तथापि उपचार चालू असताना त्याचे तेथे निधन झाले.शासनाच्या वतीने या कुटुंबाला मदत देण्याचेही त्यांनी या वेळेस बोलताना स्पष्ट केले.
चक्रीवादळामध्ये 61 कच्ची घरे व 8 पक्की घरेही बाधित झालेली आहेत. त्याचबरोबर मका, फळबागा, ऊस व अन्य पिकांनाही याची झळ पोहोचली असून सुमारे 200 एकर क्षेत्रातील पिकांना याचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. शिवाय 4 जनावरे या वादळामध्ये दगावले आहेत. शिवाय पावसानेही सर्वदूर तडाखा दिल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काल तालुक्यामध्ये 111 मिलिमीटर सरासरी पाऊस पडला व ही सरासरी 20.31 इतकी राहिली. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार घाटघर येथे 131 मिलिमीटर पाऊस झाला व सर्व ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने या पावसाने पाणीटंचाई निवारण होण्याच्यादृष्टीने हातभार लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शिवाय पेरणीपूर्व कामेही सुरू होतील व हे कामे होण्याने बऱ्यापैकी खरिपाच्या पिकांच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मदत होईल, असा हा रोहिणीचा पाऊस राहिला असे ते म्हणाले.
पावसाने 50 विजेचे पोल पडले. शिवाय 70 तारा तुटल्या. पाच ठिकाणी झाडे पडली. तेथे पोल वाकले व तारा तुटल्या. अकोले शहराचा आज सायंकाळपर्यंत गावठाण फिडर सुरू होईल. तर ग्रामीण भागातील गावठाण फिडर पुरवठा उद्या हा सायंकाळपर्यंत सुरू होईल असे सांगून या पावसाने मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली असल्याने वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे.
अकोले येथे मॉडर्न हायस्कूलच्या जवळ तारा तुटल्या होत्या. त्यामुळे या भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. या भागातील वीजपुरवठा काल सकाळी साडेआठ वाजता गायब झाला तो आज दुपारी साडेबारा वाजता म्हणजे तब्बल तासांनी या भागातली वीज सुरळीतपणे सुरू झाली. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा हा विस्कळीत झाला होता. शिवाय वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना होती. इन्वर्टर डाऊन झाले आणि डासांचा प्रादुर्भाव या भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर जाणवला.