नाची दिल्ली : डबघाईला आलेल्या एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केलीय. दरम्यान अद्याप टाटा सन्स किंवा एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियासाठी पॅनलने टाटा ग्रुपची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच अधिकृतपणे याची घोषणा करु शकते.
Tata Sons wins the bid for national carrier Air India. Tata Sons was the highest bidder. Union Home Minister Amit Shah-led ministerial panel has given approval to this bid: Sources pic.twitter.com/99OdR9LXCA
— ANI (@ANI) October 1, 2021
दरम्यान, जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. 1953 मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.
सरकारनं संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं होतं की, आर्थिक वर्ष 2019-20च्या प्रोविजनलच्या आकड्यांनुसार, एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचं कर्ज आहे. एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेडचे स्पेशल पर्पज व्हीकल (SPV) ला एअरलाइन्सद्वारे 22,064 कोटी रुपये ट्रान्सफर केल्यानंतरची ही रक्कम आहे.
2007 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यानंतर एअर इंडिया कधीच नेट प्रॉफिटमध्ये राहिली नाही. एअर इंडियाला मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या तिमाहीत सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीवर 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 60,074 कोटींचं कर्ज होतं. परंतु, आता टाटा सन्सला यामधील 23,286.5 कोटी रुपयांचं कर्जाचा भार उचलावा लागणार आहे.