कार्ला – ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असे एकमेकांना शुभेच्छा देणारा मकरसंक्रातीचा सण आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे तिळाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तिळाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तीळ आणि तिळापासून तयार होणारे पदार्थ महागले आहेत.
सध्या तिळाचे भाव किरकोळ बाजारात २२० ते २४० रुपये किलो आहेत, तर गूळही ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही महिन्यांपूर्वी १६० ते १८० रुपये प्रतिकिलोने विकली जाणारा तीळ संक्रांतीच्या तोंडावर महागला आहे. त्यामुळे यंदा तीळगूळ महागणार आहे.
काही वर्षांपासून सातत्याने तिळाचा पेरा कमी होत चालला आहे. दहा वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात काही प्रमाणावर तिळाचा पेरा असायचा. मावळ तालुक्याचा विचार केला, तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिळाचे पीक आढळून येते. हा पेरा कमी होण्यामागचे ही काही कारणे आहेत.
काही जाणकार शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी तीळ मोठ्या प्रमाणावर पिकविली जात होती. तेव्हा रासायनिक फवारण्याचा, औषधींचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे उत्पादनही तशाच पद्धतीने निघायचे. हल्ली कीटनाशक व खराब बियाण्यांचा तीळ शेतीला फटका बसत आहे. कुणी तिळाचा पेरा केला, तर शेजारील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तणनाशक औषधाची फवारणी केली, तर त्याचा परिणाम तीळाच्या शेतीवर होतो. वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेतकरी तीळ पिकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे भाववाढ होते. मावळ तालुक्यात उत्पादन कमी असल्यामुळे व्यापारी अन्य राज्यातून तीळ आणि तिळाचे पदार्थ मागवितात. गुजरातमध्ये तिळाचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी आवाहन केले जाते.
म्हणून शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
चांगल्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येणाऱ्या काळामध्ये एक तीळ सात जणांना खाण्याची वेळ येणार का? तिळाचे पदार्थ आपल्या आहारातून हद्दपार होण्याच्या धोका आहे. तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचे वाढते दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणारे आहेत.