मुंबई : जळगावातील पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची महासभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी १५ दिवसांत सरकार कोसळणार, असे म्हणत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
पुढील पंधरा दिवसात सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्यावर काहीही बोलायचं नाही. संजय राऊत आणि माझी नागपूरमधून एकत्र येत असताना भेट झाली होती. त्यानंतर समक्ष आणि फोनवर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. संजय राऊतांनी कोणत्या आधारे वक्तव्य केलं माहिती नाही. अनेकजण अशी वक्तव्यं करतात. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची माहिती माझ्याकडं नसल्याने त्यावर काय बोलू?,” असे म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या दाव्याला अप्रत्यक्षपणे खोडून काढले आहे.
मुंबईतील महाविकास आघाडीच्या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, की स्वत: लक्ष घालून परवानगी मिळवून घेतो. नागपूरमधील ‘वज्रमूठ’ सभेला परवानगी देताना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला.
लोकशाहीत संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्याचा वापर करून सभा घेता येतात. फक्त सभेत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा कोणाच्या भावना दुखवणार नाहीत, अशी भाषणे केली पाहिजेत,” असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.