मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेकदा शाब्दिक युद्ध झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, काल अजित पवार रात्री अचानक शरद पवारांच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या सर्व चर्चांना खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे.आज नाशिकमध्ये आले असताना त्यांनी या भेटीमागील कारण सांगितले.
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी, “काकींचं शुक्रवारी एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं.”
“माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो,” असे स्पष्ट शब्दात मत अजित पवारांनी भेटीविषयी सांगितले.
तसेच “आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली. त्यांना २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की, तिथं गेलं पाहिजे आणि मी तिथं गेलो,” असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले.